Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, May 31, 2014

0 वळून पाहताना भाग ५


आधीची दोन्ही युद्धे काश्मीरला मध्यवर्ती ठेऊन दोन्ही देशात लढली गेली तरी १९७१ चे भारत-पाक युद्ध बऱ्याच अंशी आधीच्या युद्धापेक्षा वेगळे होते. ते काश्मीर प्रश्नाशी निगडीत नव्हते. तसेच अमेरिकेचा ह्यात आधीपासून सहभाग होता व प्रेसिडेंट निक्सन आणि त्यांचे विदेश मंत्री किसिंजर यांचा याह्याखानच्या पूर्व पाकिस्तानातील कारवाईस पूर्ण पाठींबा होता. पंजाबी मुसलमानांची बंगाली मुसलमानांबद्दल असलेली गौणत्वाची भावना, बंगाली संस्कृती हि हिंदू संस्कृती समान असल्याचा पूर्व पाकिस्तानी भाव, इ मुळे पश्चिम पाकिस्तान त्यांना जसे ठेवेल तसे त्यांनी रहावयाचे हा अलिखित नियमच होता. याह्याखानानी एका वार्तालापात सैनिकी अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले होते, ”Kill three millions of them (Bangladeshi) and the rest will eat out of our hands.” त्यामुळे त्या वर्षीच्या निवडणुकात अवामी लीगला मिळालेले बहुमत व शेख मुजीब उर रहमान देशाचे भावी प्रमुख होणार हि कल्पनाही पंजाबी मुसलमानांना – प्रामुख्याने भूत्तोना - म्हणजेच पश्चिम पाकिस्तानला असह्य वाटत होती. भारताच्या बाजूच्या विचाराचे सरकार आले तर पाकिस्तानचे काय हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला होता. ह्या काल्पनिक भीतीने ‘ऑपरेशन सर्चलाईट’ ला जन्म दिला.

       सुरवातीला पूर्व पाकिस्तानमध्ये एकाच वेळी सर्व प्रमुख शहरे ताब्यात घ्यायची आणि तेथील साऱ्या पृथकतावादी, राष्ट्रीयतावादी, अवामी लीगवादी म्हणजेच सर्व विरोधी मग ते राजकीय असोत कि सैनिकी – एका महिन्यात पूर्णपणे संपवायचे. पाकिस्तानी आर्मीने भारत प्रेमी व मुजीब-प्रेमीची कत्तल करून सारा पूर्व पाकिस्तानचा प्रांत पाकिस्तानधार्जिणा करण्याचा मोठा अघोरी घाट घातला होता. २५ मार्च, १९७१ ला कारवाई सुरु झाली. मृत्यूचा, अत्याचाराचा व हिंसेचा अनिर्बंध हैदोस घातला गेला जो चेकोस्लोवाक किवा रवान्दाच्या नरसंहारालाही लाजवेल असा होता. जहान आराच्या शब्दात सांगायचे झाले तर, “Even if a lower range of 1.5 million deaths was taken, killings took place at a rate of between 6,000-12,000 per day, through the 267 days of carnage.”  ह्या नरसंहारात ९९१ शिक्षक, १३ पत्रकार, ४९ फिजिशिअन्स, ४२ वकील, व १६ लेखकांना कंठस्नान घालण्यात आले. ह्या सर्व बुद्धीजीवी हुतात्म्याच्या स्मरणार्थ १४ डिसेंबर, हा ‘शहीद बुद्धीजीबी दिवस’ म्हणून बांगलादेशी पाळला जातो. बांगलादेशी आकडेवारीनुसार २००,००० बलात्काराच्या तर असंख्य war-babies च्या केसेस नोंदविल्या गेल्या. ५६३ स्त्रिया पाकिस्तानी ब्रौथेल मध्ये डांबल्या गेल्या. जवळ-जवळ ६०% हिंदूनां भारतात प्राण वाचविण्यासाठी निर्वासित म्हणून जगावे लागले ज्याची नोंद ‘एव्हड्या कमी काळात निर्वासितांची झालेली सर्वात मोठी एकमार्गी वाहतूक’ म्हणून इतिहासात झाली आहे. गैर-मुस्लीम नरसंहारात भारतीय सीमेलगतच्या खुलना जिल्ह्यातील चूकनगरचा (८,०००-१०,०००) सर्वात मोठा नरसंहार मानला जातो. हि सारी अधर्मी कृत्ये धर्माच्या नावावर! आपल्या स्वत:च्या बंधू-भगिनीवर अत्याचार करताना, माणूस माणसाला मारताना, त्यांचा जीव घेताना एव्हडा आंधळा कसा होऊ शकतो?  धर्मांधता, दुसरे काय! भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा असहनीय भार होता व तो जास्त काल शिरावर घेणे शक्य नव्हते. याची कल्पना पाकिस्तानसह सर्व प्रमुख देशाना वेळोवेळी देण्यात आली होती. सारे राजनयिक प्रयत्न विफल ठरत होते. अलेक्झांडर बर्कमान यांचे शब्द, “War means blind obedience, unthinking stupidity, brutish callousness, wanton destruction and irresponsible murder” यथार्थ ठरत होते. भारत-पाक युद्धाचे ढग आता क्षितिजावर स्वच्छपणे दिसू लागले होते. 

       स्व. इंदिराजी धोरणी होत्या. ह्या सगळ्याची परिणीती युध्दात होणार व अमेरिकेचे सहाय्य पाकला असणार हे ध्यानात घेऊन, त्यांनी ऑगस्ट ९ ला रशियाशी २० वर्षाचा परस्पर सामंजस्याचा करार केला जो ह्या व नंतरच्या युद्धात निर्णायक ठरला. ह्या युद्धात सेनाधिकाऱ्याशी चर्चा व त्यांच्या अनुभवी सल्ले आपल्या तत्कालीन पंतप्रधानांनी मानले हे विशेष. १९६२ च्या भारत-चीन युद्धात व ह्या युद्धातील महत्वाचा हाच तो फरक! 

 प्रकाश पटवर्धन

Friday, May 30, 2014

1 शायरीचा गुलदस्ता भाग ३



कुठून तरी शांत वातावरणात कानावर गुलाम अलीचे स्वरात शब्द पडतात "'हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पी ली है" अन अकबर इलाहाबादीची प्रकर्षाने आठवण होते. वरील गझल ऐकली कि शायराबद्दल वेगळीच समजूत होते. एखादा मोगल-कालीन पियक्कड शायर आसावा, दुसरे काय! मित्रानो, अकबर इलाहाबादी  हे स्वातंत्रपूर्व काळातील 
फनकार, कधीही मदिरेलाशिवलेला, देशभक्त, आपल्या जगावेगळ्या पेश करण्याच्या पद्धती ने उर्दू साहित्यात मान्यता पावलेला असा अलौकिक शायर!

मित्रानो, दोन उपमा घेऊन इंग्रजांची चाल व त्याचा अभिप्रेत अर्थ आपल्या जनतेपर्यंत पोहोचविणारा, हा साहित्य-सूर्य, हिंदू-मुस्लीम ऐक्याचा प्रणेता होता.
 
हि गझल वा तिचा अर्थ कळण्यासाठी, तत्कालीन इतिहासाची  थोडी पूर्वपीठीका पहावी लागेल. स्वातंत्रपूर्व काळात एक वेळ अशी आली होती कि 'हिंदू-मुस्लिम' वैर शिगेला पोहोचले होते. इंग्रजांना जे हवे होते तेच होत होते म्हणून इंग्रज आगीत तेल ओतत होते. अशा परिस्थितीत अकबर इलाहाबादी हे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नामुळे काही जहाल मुस्लिम संघटना त्यांच्या विरुद्द  टीका करू लागल्या कि "या इलाहाबादीला हिंदुनी पाजली (bribed ) आहे आणि त्या नशेत हा अस काही अनर्गल  बडबडत आहे". या टीकेला उत्तर देताना त्यांनी समस्त टीकाकारांना प्रश्न केलेला होता ‘हंगामा है क्युं बरपा सा, थोडीसी जो पी ली है........’

या गजलेचा मतला असा आहे कि, 

हंगामा है क्यो बरपा थोडीसी जो पी ली है, 
डाका तो नही डाला, चोरी तो नही की है  | 
(बरपा : सर्वदूर , everywhere) 

येथे पिणे आणि मय (मदिरा) हे 'प्रेम' आणि 'दयाळूपणा' (human kindness , love ,) साठी प्रतीकात्मक म्हणून वापरलेले आहे. 

शायर म्हणतो, बाबारे, मी प्रेमरूपी मदिरेचे थोडे प्राशन केले तर इतका आरडओरडा? मी काही डाका टाकलेला नाही वा चोरी केलेली नाही. फक्त  हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या प्रेमातून दोन समुदायात निर्माण झालेल्या मानवतेची, सौहार्दाची किंवा आत्मियतेची मदिरा लाजवाब आहे आणि अशा अलौकिक मदिरेची नशा येणे क्रमप्राप्तच आहे.

पुढच्या शेरात हि संकल्पना मोठ्या खुबीने शायर आपल्या पुढ्यात ठेवतो- . 

"
उस मयसे नही मतलब,  दिल जिससे से हो बेगाना, 
मकसूद है उस मयसे, दिल हि मी जो खिचती है | 

अकबरर्जी म्हणतात, तुम्हाला जी ‘मय’ – मदिरा अभिप्रेत आहे ती प्यायल्यावर चढते व तुम्हाला ‘बेगाना’ करते. मात्र माझ्या हिंदू-मुस्लीम मयखान्यातील ह्या मदिरेला तुमच्या त्या बेगान्या करणाऱ्या मादिरेशी काही देणे-घेणे नाही. हि दोन समाजातील सामंजस्याची, दोन्ही कडील लोकांच्या आनंदाची मदिरा चढते पण बेगाना करीत नाही तर सरळ हृदयस्त होते, दृदयात उतरते. ते पुढे म्हणतात -

नातजुर्बा-कारीसे वाइजकी ये बाते है, 
इस रंग को क्या जाने, पूछो तो कभी पी है| 
(नातजुर्बा-कारी  : inexperience) 

त्यांच्यावरील टीका हि त्या लोकांनी कधी दोन जमातीत एकतेसाठी मानवतेचे काम न केल्यामुळे होते आहे हे जाणून ते म्हणतात, माझ्या  मदिरेची चव चाखली असती तर, ते हिच्या रंगात रंगून गेले असते तर, अशी टीका, असे शब्दच त्यांनी उच्चारले नसते, त्यांना माझं म्हणणे पटले असते. समाजाभिमुख कार्याची नशाही काही औरच असते पण....

सूरज में लगे धब्बा , फितरत के करिश्मे है , 
बुत हमको कहे काफिर, अल्लाह कि मर्जी है | 
(फितरत : प्रकृति, स्वभाव, nature , temperament . 
काफिर :  अविश्वासी , infidel)  

तसे पाहायला गेले तर ज्याप्रमाणे त्या स्वयं प्रकाशी सूर्यावर डावा ग्रहण हा निसर्गाचा करिष्मा (चमत्कार, magic  ) आहे, त्याच प्रमाणे ह्या मंडळीनी आम्हाला काफिर म्हणावं हिसुद्धा ईश्वरी इच्छाच असावी. हिंदू काय मुसलमान काय, सारे देवाची मुलं! त्याचा अंश घेऊन जगत आहेत, मग त्यात डाव-उजवं कसे व कश्यासाठी. आम्ही सर्व एकाच परमात्म्याचे अंश आहोत मग त्याने दर्शविलेल्या मार्गावर गुण्या-गोविंदाने जाण्या ऐवजी एकमेकांना कमी लेखाने, दुस्वास करणे, प्रसंगी जीवावर उठण्याची दुष्मनी कां? जरा दोस्त होऊन पहा, एकमेकांवर प्रेम करून पहा, ह्या मदिरेची मी इतकी तारीफ का करतो.


हर जर्रा चमकता  है अनवारे-इलाही से, 
हर सांस ये कहेती है , हम है तो खुदा भी ही | 

या जगात अगदी सगळे त्या परमात्म्याच्या कृपेने जगत आहोत. त्या परमेश्वराच्या छायेत आपण जगत आहोत आणि आपला पत्येक श्वास-उश्वास साक्षी आहे कि आम्ही आहोत तसाच तो सर्व शक्तिमान हि आहे, आपल्या प्रत्येक चांगल्या-वाईट कर्माचा तो साक्षीदार आहे.  

शेवटी नझीरअली आदिल चा शेर आठवतो, 

मैने दुनिया के रवैय्ये कि शिकायत  कि थी , 
तुमने कुछ और जो समज़ा तो गलत समज़ा है | 


आजही social network  वर समाजा-समाजात द्वेष भावना पसरवणारी चित्रे/मजकूर  टाकली जात असतात,  मात्र त्याऐवजी एकमेकातील प्रेमभाव कसा वृद्धिंगत होईल याचा विचार करीत नाही. अकबर इलाहाबादी काय वा कबीरदास काय ह्याच ‘ढाई आखर प्रेम का’ ची मदिरा आकंठ पीत आले. आम्ही कधी त्यांचे अनुकरण करणार आहोत.

 दत्तात्रय पटवर्धन 
 विजया यादव 




Thursday, May 29, 2014

0 वळून पाहताना भाग ४


१९६५च्या युद्धाचा विचार करताना पाकिस्तानने किवा त्यांच्या राज्यकर्त्यांनी हाच काल का निश्चित केला हे ध्यानात घेतले पाहिजे. सन १९६४ला पंडित नेहरुचे मेमध्ये निधन झालेले होते व देशाचे शासन नव्या पंतप्रधानाकडे होते. काश्मीर मधील स्थिती गंभीर होती, तेथे संविधानाचे कलम ३५६ व ३५७ लागू करण्यात आले होते व शेख अब्दुल्ला यांनी ते काश्मीरच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचे जाहीर केले होते. ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे पाकिस्तानचा गैरविश्वास/गैरसमज झाला कि पाकिस्तानच्या सैन्याला ह्या फुटीरतावादी गटांकडून सहकार्य/फायदा होईल. पाकिस्तानी थिंक-टेकने असाही विचार केला होता कि १९६२च्या भारत-चीन युद्धातील पराभूत भारतीय सैन्याचे मानसिक खच्चीकरण झाले असल्यामुळे ते पाकिस्तानी सैन्याचा सामना करू शकणार नाहीत. पंजाबी मुसलमानांचे वर्चस्व असलेल्या पाकिस्थानी सैन्यात एक असाही गैरसमज रुजवला गेला आहे की ते एका लढवय्या जमातीचे सदस्य असून एक पाकिस्थानी सैनिक चार-चार भारतीय सैनिकांना भारी आहे.

       दिनांक ५ ऑगस्ट, १९६५ ला २२,००० ते ३३,००० पाकिस्तानी सैनिकानी काश्मिरी नागरिकांच्या वेषात काश्मीरच्या विविध भागात घुसखोरी केली. असे करताना पाकिस्तान विधिवत युद्धाची घोषणा करण्याचे सुद्धा विसरले. गम्मत अशी कि ह्या घुसखोरीची प्रथम सूचना आपल्या सैन्यांला काश्मिरी नागरिकांनीच दिली होती, ज्यांच्याकडून पाकीस्थान मदतीची अपेक्षा करीत होता. प्रथम युद्धाची व्याप्ती, आर्टिलरी आणि चिलखती गाड्याची गतीविधी काश्मीरच्या विविध भागापर्यत मर्यादित होती तर ६५च्या युद्धात भारतीय वायुसेनेचा सहभाग उल्लेखनीय होता. सप्टेबरच्या सुरवातीला पाकिस्तानी सैन्याने जेव्हा अखनूरवर हल्ला केला, तेव्हा भारतीय सेनेने प्रथमच आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करून पाकिस्तानी ठिकाणांवर हल्ला केला ज्यायोगे पाकिस्तानी सैन्याचे लक्ष विचलित व्हावे. सियालकोट क्षेत्रात ह्या युद्धातील सर्वात मोठी लढाई झाली ज्यात ४००-६०० रणगाडे सामील झाले होते. सप्टेंबर २२ ला संयुक्त संघाच्या पुढाकाराने दोन्ही देशात युद्धबंदी झाली.

       ह्या युद्धाची परिणीती फक्त एकमेकांचे काही युद्धबंदी व काही वर्ग किलोमीटर क्षेत्र ताब्यात घेण्यात झाली मात्र दोहोंची फार मोठ्या प्रमाणावर मनुष्य व अन्य हानी झाली.

               सम्या, ह्या युद्धाची आंतरराष्ट्रीय परिणीती मात्र खूप अनपेक्षित अशी होती. ह्याच वेळी अमेरिका विएतनामच्या युद्धात गुंतलेली होती. एकीकडे अपेक्षेप्रमाणे अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीला न येता, तटस्थ असल्याचे पत्रक जारी केले. येव्हडेच नव्हे तर अमेरिकेने पाकीस्थानला देण्यात येणारी सैनिकी मदतही कमी केली. इराण, इंडोनेशिया व विशेषत्वाने चीनने पाकचे राजनयिक समर्थन (Political support) केले. आणखी एका अनपेक्षित घटनेत जो भारताच्या बाजूने सतत उभा रहात होता त्या रशियाने आपण तटस्थ असल्याचे जाहीर केले व नंतरच्या काळात जानेवारी, १९६६मध्ये ताश्कंदला दोन्ही देशात करार घडवून आणण्यात महत्वाची भूमिका वठवली. तुला आठवत असेल येथेच आपल्या पंतप्रधानाचा मृत्यू झाला. ताश्कंदला मोठी स्वप्ने घेऊन गेलेला हा वीर मात्र खऱ्या अर्थाने मायदेशी परत आलाच नाही. राजकारणात कोणी कुणाचे नेहमीचे दोस्त वा शत्रू नसतात हेच खरे!

                             दोस्त दुश्मन पे कुछ नही मौकुफ
                             एक जमाना है अपने मतलब का.

     ह्याच युद्धापासून पाकच्या परराष्ट्र धोरणात अमुलाग्र बदल झाला. पूर्वी ते एकाच देशावर – अमेरिकेवर – अवलंबून असत. आता त्यांनी रशिया व चीनशी दोस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरु केले, ते भारताशी तुलनात्मक रीत्या स्पर्धेत राहावे म्हणून. बेटा समीर, पाकीस्थानवरचा चीनचा वाढता प्रभाव व नजीकच्या काळात त्यांनी पाकीस्थानला वेळोवेळी केलेल्या मदती मागचा अर्थबोध आता स्पष्ट होऊ लागला असेल.  पाकीस्थानी “Triangle Tightrope”  नीती म्हणजे एकीकडे जुन्या सहकाऱ्याशी – अमेरिकेशी - चांगले संबंध ठेवायचे तर दुसरीकडे चीन व रशियाशी संबंध विकसित करायचे. १९६६मध्ये लष्करी मदती पासून सुरु झालेले हे पाक-चीन संबंध आज इतके विस्तारले आहेत कि चीन हा पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरविणारा जगातला सर्वात मोठा देश तर पाकिस्तानशी व्यापार-उदीम करणाऱ्या देशांत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे सहकार्य पाणबुडी पासून ते अणु-उर्जेच्या नावाखाली आण्विक अस्त्र निर्मिती पर्यंत पोचले आहे. आपल्या सारख्या सामान्य माणसाला ‘आगे आगे देखिये होता है क्या’ शिवाय पर्याय नाही. 

 प्रकाश पटवर्धन



Wednesday, May 28, 2014

0 शायरीचा गुलदस्ता. भाग २


उर्दू  मध्ये 'मय' म्हणजे 'मद्य'. प्रेमी युगलाना या प्रेमरूपी मद्याची  धुंदी  चढते. हि इष्काची धुंदी याला नशा म्हटलं जात. यातच कधी  प्रेयसीचा वियोग होतो आणि या वियोगाच्या दुक्खा मुळे व ते विसरण्यासाठी तो मादिरालयात जाऊन पोहचतो. याच मादिरायला 'मयकदा' किव्वा 'मयखाना' असे म्हणतात. आता मदिरालय म्हटलं कि मद्य देणारी युवती म्हणजे 'साकी' अथवा 'साकीया' आणि तिच्या हातातील प्याला येतोच. हा प्याला म्हणजे 'जाम' अथवा 'सागर'. या मद्याची धुंदी म्हणजे 'सरूर' आणि हि अवस्था पुष्कळ वेळ राहते त्याला 'खुमार' म्हणतात.

उर्दू शायरी मध्ये हे शब्द वारंवार  येतात. त्यामुळे अनेकवेळा असे वाटते कि उर्दू शायर हा मदिरा आणि मदिरालय याचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे शायरी आणि शायर हे बदनाम झालेले आहेत. उर्दू शायरी मध्ये हे सर्व शब्द अनेकवेळा प्रतीकात्मक म्हणून वापरले जातात.

उसके पैमाने कुछ और, मेरे पैमाने में कुछ और
देखना साक़ी हो न जाये, तेरे मैखाने में कुछ और |

इथे शायर या सर्व बदनाम शब्दांचा प्रतीकात्मक म्हणून उपयोग करतो. मैखाना म्हणजे जग, (world ) साक़ी म्हणजे देव आणि
पैमाना म्हणजे नशीब असे संकेत वापरलेले आहेत.

आता येथे शायर देवाला नेहमीचाच प्रश्न विचारत आहे. कोणाच्या नशिबात  काय तर कोणाच्या नशिबात काय. अरे देवा तुझ्या या जगात
असाच अन्याय चालेल तर एक दिवस मोठा हाहाकार माजेल.

असाच पुढील शेर पहा,

इक जगह बैठकर पी लूं ये मेरा दस्तूर नहीं,
मैकदा तंग बना लू ,  मुझे मंजूर नहीं |

आता हा शायर कसा अगदी पियक्कड़ वाटतो ना?   येथे 'मैकदा तंग बनादू ' विचारांना सीमित ठेवणे (confinement of thought ) असा आहे.प्रत्येक धर्मात कर्मकांडाच्या
विशिष्ट सीमेत माणसाला बांधून ठेवलं आहे ( religious dogmas ) . त्यापलीकडे जाऊन विचार करण्याला पाबंदी आहे . म्हणून शायर म्हणतो कि, मला या विचारांच्या
पलीकडे जायचं आहे एखाद्या विशिष्ट ढाच्यात बसून विचार करणे माझ्या स्वभावात नाही आणि विचारांना सीमित ठेवण मला मंजूर नाही. 


 दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव  

वाचा 
 

Tuesday, May 27, 2014

3 कबीराचे दोहे भाग 6


एकदा मी बाप्याच्या घरी  गेलो. आश्चर्य वाटतंय का? होत काहीतरी काम. पण मनात पक्क होत काहीतरी ऐकावं लागणार तेव्हांच माझ काम होणार.
मी घरी गेलो. घरातल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या परंतु बाप्या काहीतरी विचारात गढलेला दिसला. मी त्याला विचारलं, "बाप्या काय विचार करतोय रे?"
बस, लगेच सुरु झाला. म्हणाला, "काल मला एक स्वप्न पडलं."
मी थोडा हादरलोच. बाप्याच स्वप्न!!!
तर बाप्या पुढे सुरु, " अरे काल माझ्या स्वप्नात, एक कुत्रा आणि मांजर आलं". आता तर मला ४४० व्होल्ट चा झटकाच लागला.
बाप्या म्हणाला, " तो कुत्रा आणि मांजर बोलत होते". बोंबला आता कुत्रा आणि मांजर बोलत होते,
मनात विचार आला आता बाप्याला ठाण्याला नाहीतर सरळ बंगलोर "निमांस" लाच न्यावे लागणार.
परंतु ऐकण तर भागच आहे. मीच  विचारलं, काय बोलत hote?"

तर बाप्या म्हणाला, " कुत्रा म्हणत होता, माझा घराचा मालक मला सर्व सेवा देतो. घरातील मंडळी मला प्रेम करतात, खायला देतात.
मला वाटते तो देव आहे.
मी म्हणालो "मग मांजर काय काय म्हणाली,"
बाप्या म्हणाला, " अरे मांजर म्हणाली, माझ्याही घराचा मालक मला सर्व सेवा देतो. घरातील मंडळी मला प्रेम करतात, घरातील मुले माझ्याशी खेळतात.
मला तर वाटते मीच देव आहे."

मी विचार करत आहे यातील बरोबर कोण? या बाप्याच्या परीक्षेत एक कठीण प्रश्न असणारच.
या एकाच प्रश्नात चारही 'life lines ' जाणार.
मी म्हणालो "बाप्या मांजरच बरोबर न!! बघ आसाराम बापू , किती सेवा मिळते, तीही लाखो लोकांकडून. किती प्रेम मिळते, अगदी सर्व कसे जीव द्यायला तयार होतात.
मग आसाराम बापू सारख्यांना मांजरीसाराखेच वाटते न!! ते चुकणे शक्य आहे का रे?"

त्यावर बाप्या चिडला व म्हणाला, अरे मांजरीला गर्व आहे. आणि कुत्रा विनम्र आहे. आपल्याच मालकाकडून (गुरुकडून) मान साम्मानाची अपेक्षा योग्य  नाही.

काबिर्दसाजी म्हणतात,  अहं अगीन हिरदै जरै, गुरु सो चाहै मान
                                     तिनको जम न्योता दिया, हो हमारे महेमान.

हृदयात अहंकाराचा अग्नी एव्हडा तीव्र आहे कि आपण जो आपल्यला सेवा देतो त्याच्याच कडून मान साम्मानाची अपेक्षा करतो. आपल्या गुरु कडूनच स्नामानाची अपेक्षा
केली जाते. अशा अहंकारी ना यमराजाचे  निमंत्रण असते कि या तुम्ही आमचे पाहुणे व्हा. तुम्ही गुरुभक्त होण्याच्या लायकीचे नाहीत. अहंकार हि दुखाची खान आहे. 



दत्तात्रय पटवर्धन 
  
वाचा