Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, June 28, 2014

2 कबीराचे दोहे : भाग 8

जलाल्लुद्दिन रुमी तेराव्या शतकातील पर्शियातील एक सुप्रसिद्ध सुफी संत आणि कवी. तो 'बल्ख' प्रदेशातला म्हणजे सध्याचा अफगाणिस्थानचा. आपल्या एका कवितेत तो म्हणतो. 

प्रियकराने दरवाजा ठोठावला आणि आतून प्रेयसीचा आवाज आला 'कोण आहे?" 
त्यावर प्रियकर म्हणाला, " मी आहे".  प्रियकराला वाटले आता दरवाजा उघडला जाईल. परंतु आत एक भीषण शांतता पसरली. प्रियकर बाहेर वाट  पाहत उभा राहिला. थोड्या वेळाने त्याने  पुन्हा दरवाजा वाजवला. आतून काहीच उत्तर आले नाही..पुन्हा वाजवला  पण उत्तर नाही. प्रियकर आता दरवाजा उघडला जाईल म्हणून वाट पाहत उभा राहिला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आता तर तो जोरजोरात ओरडून सांगू लागला, प्रिये, मी आहे दरवाजा उघड. थोड्या वेळाने आतून आवाज आला. येथे दोन जण सामावू शकत नाहीत. आता त्याच्या लक्षात आले कि दरवाजा काही उघडला जाणार नाही. 

प्रियकर मागे फिरला. विचारात गुंग. त्याला कळत नव्हते 'येथे दोन जण सामावू शकणार नाहीत' म्हणजे काय? विचार करत  करत उत्तराच्या शोधात जंगलात भटकला, साधना केली, उपासना केली, अनेक अग्निदिव्यातून  गेला. आणि एक दिवशी परत आला.  दरवाजा वाजवला. आतून तोच आवाज आला, 'कोण आहे?"  प्रश्न  तोच होता परंतु उत्तर बदलेल होत. उत्तर आलं 'तूच आहेस'. आणि एकदम दरवाजा उघडला. 


कबीरदासजी  म्हणतात, 
प्रेम गली अति संकरी ता  में  दो न समाय, 
जब मै था तब हरी नाही, अब हरी है मै नाही. || 

कबीरदासजी म्हणतात, या प्रेमाच्या मार्गात दोघे कधीच सामवू शकत नाहीत. 'तू' आणि  'मी ' कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. प्रेम तेव्हांच होत जेव्हा ' मीलुप्त होतो. संपूर्ण समर्पण होऊन 'मी ' अस्तित्वहीन होत. समुद्रात पाण्याचा थेंब  पडल्यावर समुद्राचे पाणी व ‘तो’ थेंब वेगवेगळे दाखवता येईल कां? पाण्याचा तो थेंब अन समुद्राचे पाणी एकजीव होते. त्या पाण्याच्या थेंबाचे स्वतंत्र अस्तित्वच नाहीसे होते. समुद्राशी एकजीव व्हायला त्या थेंबाला त्याचं 'मी' पण 'स्वत्व’ सोडावं लागत. समुद्रात पाण्याचा थेंब आहे परंतु त्याने आपल्या वेगळे पणाचा त्याग केलाय. समुद्र आहे तेव्हा पाण्याचा थेंब नाही आणि थेंब आहे तेव्हा समुद्र नाही.
 
परमात्म्याची भक्ती करतांना, त्याच्या ठायी पूर्ण समर्पण असावे लागते. त्या सर्वेश्वराची सेवा करतांना सर्वसंग परित्याग करावा लागतो, आपपरभावाची तिलांजली द्यावी लागते. परमात्म्याकडे नेणारा मार्ग ‘संकरी’ म्हणजे निमुळता आहे कारण तेथून एका वेळी एकच जण जाऊ शकतो. म्हणून संतसज्जन म्हणतात हे सारे मानवीय बंध येथेच सोडा, मोकळे व्हा, एकट्यानेच पुढचा प्रवास करायची तयारी करा, म्हणजे हाच मार्ग प्रशस्थ होईल. आपण आनंदाने व सहजपणे जगदिशाच्या पायी रहाल.

 दत्तात्रय पटवर्धन 
 

2 comments:

  1. Jesus says," Narrow is the gate that leads to me."

    ReplyDelete
  2. प्रेम बिना जो भक्ती है, सो नित दंभ बिचार,
    उदार भारत के कारण, जन्म गवाये सार ||

    जे प्रेम भक्ती शुन्य आहे ते तर केवळ ढोंग आहे. केवळ पोट भरण्या साठी हा दुर्लभ मानवजन्म वय घालवण्यासारखे आहे.

    ReplyDelete