Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, June 10, 2014

1 वळून पाहताना : भाग 7



एका जुन्या हिंदी बोलपटातील प्रसिध्द गाण्याप्रमाणे “दिलने जिसे पाया था, आंखोने गवया है’ सारखी स्थिती भारताची सिमला अग्रीमेंट नंतर झाली. प्रत्येक युद्धात वीर सैनिकांनी जे मिळविले होते ते राजकारण्यांनी मातीमोल केले. एका पेनच्या फटकाऱ्याने ३३०० वीरांच्या बलिदानाने जिंकलेली सुमारे १३,००० वर्ग कि मी पश्चिम पाकिस्तानची भूमी (काही सामरिक महत्वाची ठाणी सोडून) व सुमारे ९०,००० हून जास्त पाकिस्तानी युद्ध-कैदी आणि २०० युद्ध-गुन्हेगार सैनिकहि कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले. मात्र झुल्फिकार भूत्तोनी, इंदिराजीना, मी युद्धकैद्यांना व भारताने जिंकलेले पाकिस्तानी क्षेत्र न सोडवता परत गेलो तर जिवंत राहणार नाही, माझा मुडदा पडेल, माझे अस्तित्व आपल्या हाती आहे अश्या प्रकारची विनवणी सतत केली होती व त्या बदल्यात मी पाकिस्थानला परतल्यानंतर लाईन ऑफ कंट्रोलला आंतरराष्ट्रीय सीमारेषा करेन हा अलिखित  शब्द पाळला नाही. आम्ही नेहमीच आमच्या शत्रूकडे मानवतेच्या द्रीष्टीने पाहिले. भारताच्या इतिहासात अशी अनेकानेक उदाहरणे आहेत कि अशी माणुसकी घातक ठरते तरी आम्ही त्यापासून काही धडा घेत नाही हाही इतिहासच आहे. राणा प्रताप काय, चाऊ एन लाय काय, भुत्तो काय नी मुशर्रफ काय! सारे माणुसकी, मानवतेच्या संकल्पनेपासून कोसो दूर. कधी बदलणार हा इतिहास अन कधी उभा ठाकेल आमच्यातला तो ‘चाणक्य’.
       सिमला अग्रीमेंट पश्चिम पाकीस्थानच्या पथ्यावर पडले. बांगलादेशाच्या निर्मितीमुळे हजारेक कि मी दूरच्या प्रदेशाचा व्याप सांभाळण्याचा नावडता प्रश्न परस्पर सुटला तसेच पंजाबी व बंगाली ह्या दोन वेगळ्या संस्कुतीचा प्रश्नही मिटला. काहीच्या मते, पाकिस्थानी जनतेच्या मनात भारत हा आक्रमक देश असून तो काहीही करून पाकीस्थान नष्ट करू पहात आहे हा गैरसमज या युद्धामुळे दृढ झाला.
       मात्र १९७१च्या युद्धामुळे किवा सिमला अग्रीमेंटमुळे भारताचा काही फायदा झाल्याचे दिसत नाही. न आपण  ‘काश्मीर प्रश्ना’ चा गुंता सोडवू शकलो, न पाकीस्थानच्या पृथकरणामुळे पाकिस्तानी आक्रमणाची भीती लुप्त झाली. ७१ च्या युद्धामुळे आपण एक नवे राष्ट्र निर्माण केले तरी हे युद्ध खऱ्या अर्थाने “निर्णायक” ठरू शकले नाही कारण - जरी भारतीय सुरक्षेची स्थिती अत्यल्प प्रमाणात सुधारली असली तरी आपण पाकिस्थानवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्यात विफल ठरलो. एका अर्थी हा राजनयिक पराभव ठरतो.
      दक्षिण आशियात वर्चस्व स्थापन करण्यासाठी व भारताची डोकेदुखी वाढविण्यासाठी चीन सतत कार्यरत आहे. भारताला सर्व बाजूनी घेरण्याची चीनची योजना सर्वश्रुत आहेच. त्याचाच हा भाग. पाकीस्थानही अमेरिकेला काट-शह म्हणून चीनला त्यांची भूमी खुली करत आहे. गाडर बंदर असो व सियाचीनचा भाग असो, वा अक्साई चीनचा मार्ग असो, सारे भारताचे सामरिक प्रश्न जटील करण्यासाठी चालले आहे.

      शेवटी काय तर ‘शून्यापासून पुढे सुरु’. दक्षिण आशियात श्रेष्ठत्वाची स्पर्धा आणखी तीव्र करण्याच्या उद्देशाने चीन पाकीस्थानला हाताशी धरत असून सर्व क्षेत्रात मदतीचा आभास निर्माण करीत आहे. नुकतेच चीनचे पंतप्रधानांनी चिन-पाकिस्थानच्या मैत्रीची तुलना “higher than mountains and deeper than the ocen.”  अशी केली.
मात्र ‘हिंदी-चीनी भाई भाई’ तील फोलपणा आम्हाला समजण्यासाठी १९६१ साल उजाडावे लागले हे पाकिस्तानने ही लक्षात ठेवणे त्यांच्या अस्तित्वासाठी श्रेयस्कर ठरेल.   

1 comment:

  1. सुहास तळेलेJune 13, 2014 at 5:39 PM

    न जाणे पाकिस्तान कधी सुधरेल आणि भारतही कधी सुधरेल? भारत आपली चुकांमधून काही शिकतो कि नाही असेच वाटते. कि आंतरराष्ट्रीय परिस्थिती त्याला काही निर्णायक करण्यास बाध्य ठरते हेच कळत नाही.

    ReplyDelete