Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label लागा चुनरी मी दाग. Show all posts
Showing posts with label लागा चुनरी मी दाग. Show all posts

Tuesday, July 8, 2014

0 कबीराचे दोहे : भाग ९


झिनी-झिनी बिनी चदरिया
काहे के ताने काहे के भरनी,
कौन तार से विनी चदरिया ||
दास कबीर जतन करी ओढ़ी
ज्यो की त्यों धर दिनी चदरिया |

हि शरीररूपी चादर किती तलम आहे. आणि चादर जितकी तलम तितकी विणण्यास कठीण. जितकी वस्तू नाजूक असेल तितकी त्याला घडवण्यास लागणारी मेहनत जास्त असते कारण त्यात एक विशिष्ट प्रकारची तल्लीनता लागते. परमात्म्याने हि तलम चादर विणली त्यासाठी कोणास ठाऊक कोणता धागा वापरला, कोणत्या प्रकारची वीण घातली ते तोच जाणे. त्याचे याबाबतचे कौशल्य अवर्णनीय आहे. परंतु कबीरजी म्हणतात, मला दिलेली हि चादर मी अत्यंत काळजीपूर्वक ओढली त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग पडू दिला नाही. "ज्यो कि त्यो धर दिनी चदरिया" जशी दिली होती तशीच परत केली. किती हि काळजी? या शरीररूपी चादरीवर कोणताही डाग पडू नये म्हणून.

परंतु आता हेच पहाना मन्नाडे यांच्या मधुर स्वरातील हे गाणं,

"लागा चुनरी में दाग छुपाऊ’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’ कैसे, घर जाऊ कैसे.. लागा चुनरी में दाग." हे मन्नाडे यांच्या मधूर स्वरातील गाण मी जेव्हा प्रथम ऐकलं त्यवेळेस माझ्या मनपटलावर विचारांचे तरंग उमटू लागले. "मोरी चुनरिया आतमा मोरी मैल है माया जाल " अश्या ओळी मन सुन्न करून जातात. साऱ्या जीवनाचं फलित ह्या ‘चुनरी’ अन ‘दाग’ सारख्या सध्या नेहेमीच्या उदाहरण भोवती गुंफल आहे. तसं पाहिलं तर या शरीराला आत्म्याची चादर किंवा चुनरी म्हटलं जातं. परंतु येथे कवी आत्मरूपी चुनरीला या संसारातील आसक्तीरुपी मळाच्या मायाजालात गुंतलेला बघतो आहे. जसजसा माणूस या मायाजालात कळत नकळत अडकत जातो. तसतशी हि चुनरी आसक्तीच्या डागांनी मलीन होऊ लागते. चिंतीत कवीची मनस्थिती पुढील ओळीत फार समर्पकपणे वर्णिल्या आहेत - "वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. जाके बाबुल से नजरे मिलाउ कैसे, घर जाऊ कैसे; लागा चुनरी में दाग."

ज्या दुनियेतून कवी पृथ्वीतलावर अवतरला ते देवाचे घर, माझे माहेर आहे व हि दुनिया (पृथ्वी) माझे सासर आहे. असे दाग घेऊन मी माझ्या पूर्वगृही माहेरी कोणत्या तोंडाने जाऊ, कसा जाऊ. ताठ मानेनं कसा उभा राहू. असा प्रश्न उपस्थित होतो, जेव्हा मृत्यू दारात उभा राहतो. बायबल मध्ये कथा आहे कि परमात्म्याने आदम आणि हौवां ची निर्मिती केली. त्यांना ईडन च्या बगीच्यात ठेवलं व सांगितलं कि या ज्ञान वृक्षाचे फळ तुम्ही खाऊ नका. परंतु एक सर्पाने त्यांना ते फळ खाण्यास प्रवृत्त केले. या आसक्तीच्या जाळ्यात फसून त्यांनी ते फळ खाल्ले. परमात्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना हद्दपार करण्यात आले आणि पृथ्वीवर पाठवण्यात आलं. तेव्हापासून मनुष्य हे पापाचं ओझ घेऊन फिरत आहे. या तडीपार केलेल्यांचे आपण वंशज. मग काय, अशा चुका आपण पुनःपुन्हा करणार. परंतु एखादा कबीर सारखा अवलिया येतो आणि म्हणतो, "ज्यो कि त्यो धर दिनी चदरिया ".

एक काळ होता जेव्हा चादर अत्यंत काळजीपूर्वक ओढली जायची. त्यावर कोणताही डाग पडू नये याची काळजी घेतली जायची नंतरचा काळ आला डाग पडू लागले परंतु बाबुलला तोंड कसे दाखवायचे असा प्रश्न पडू लागला. न जाणे पुढील काळ असा येईल कि किती हि डाग पडले तरी त्याची चिंता नाही आणि बाबुल समोर तसे डाग घेऊन उभे राहण्यात कोणतीही अडचण नसेल. असो काळ तर बदलत जाणार. पुढे काय होते कोणास ठाऊक, आलेया भोगासी असावे सादर.

 दत्तात्रय पटवर्धन

कबीराचे दोहे : भाग 8,  कबीराचे दोहे : भाग ७,  कबीराचे दोहे भाग 6,  कबीराचे दोहे भाग ५
 कबीराचे दोहे भाग ४