Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, June 23, 2014

0 वळून पाहताना : भाग ८



१९७१च्या युद्धानंतर ‘सीआचेन ग्लेसिअर’ हा शब्द भारत-पाक वर्तुळात खूपच गाजला. तिथल्या बाल्टिक भाषेत  Sia    म्हणजे गुलाबाची एक प्रजाती जी त्या भागात मोठ्या प्रमाणावर उगवते आणि chun म्हणजे कोणतीही वस्तू जी अमाप प्रमाणात मिळते. तसाच ‘ला’ या शब्दाचा अर्थ खिंड असा होतो. ‘सियाचेन’ हा काराकोरम पर्वतातील ग्लेसिअर प्रांत आहे जो पूर्णत: मानवरहित तसेच undemarcated; जणूकाही अस्पर्श! ह्या ७० कि.मी./४३ मैलाचा साल्तोरो रिजच्या प्रांतातून तीन खिंडी जातात – १. “साई ला” (१८८३६ फु), २. “बिल्फोंड ला” (१७८८० फु), आणि ३. “ग्योंग ला” (१८६६५ फु). काराकोरामचा हा सर्वात लांब, आणि जगातील दुसरा सर्वात लांब नॉन-पोलर ग्लेसिअर आहे. ह्या भागात दोन्ही देशांचे एकूण १५० आउट-पोस्ट आहेत, उंची समुद्र सपाटी पासून २१,००० ते २२,००० फुट असून तापमान (-)५० ते (-) ७० पर्यंत जाते. दोन्ही देशांचे अंदाजे ३,००० सैनिक येथे असून सुमारे २०० अमेरिकी डॉलरचा खर्च दिवसागणिक आहे.

      साहजिकच एका छोट्याश्या बर्फाळ तुकड्यासाठी एव्हडा मोठा खर्च कशासाठी, असा विचार तुझ्या मनात आला असेल.  समीर, हा पट्टा सामरिकदृष्टा अतिमहत्वाचा आहे. चीन व पाकीस्थान मधून लडाखमध्ये प्रवेश होतो तो ह्याच तीन खिंडीतून. सियाचेंनवर भारतीय नियंत्रण असल्यामूळे चीन, पाकिस्थानला ह्या भागातील कोणत्याही लढाईत/संघर्षात मदत करू शकत नाही तसेच उत्तर लडाखला उर्वरित भारतापासून वेगळे पाडण्याच्या संभाव्य पाकीस्थानी प्रयत्नावर नियंत्रण येते. ह्या लष्करीदृष्ट्या महत्वाच्या बाबी शिवाय आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे ह्या ग्लेशिअर खाली नैसर्गिक तेल व वायूचे मोठे साठे असल्याचा कयास! म्हणून ह्या भागावर नियंत्रण म्हणजे अशा उर्जा साठ्यांचे स्वामित्व! अक्साई प्रांतात पाकिस्थानच्या मदतीने चीनने बाल्तीस्थानात आपले अस्तित्व वाढवण्याची क्रिया सुरु केली आहे व त्यासाठी पश्चिम तिबेटपासून ते इस्लामी प्रश्नी संवेदनशील अशा झिन्झीआंग प्रांतातून जाणाऱ्या मार्गाचा (Surface Communication Network)  त्वरेने सर्व सीझनमध्ये वस्तू आणि सैन्याच्या दळणवळणासाठी विकास करीत आहे. विशेष म्हणजे ल्हासा ते काश्गरपर्यंतचा हा मार्ग भारत-चीनच्या सीमेला समानांतर जातो. अशा परिस्थितीत चीनला ह्या क्षेत्रात भारताची समीपता व वाढते अस्तित्व चिंताजनक वाटणे साहजिक आहे.     

सियाचेनच्या एकूण भागापैकी २/३ भाग भारताच्या ताब्यात आहे. येथील हवामानामुळे येथे दोन-चार महिन्यापेक्षा जास्त काल अगदी येथील वातावरणात रुळलेल्या (acclimatized) सैनिकाना रहाता येत नाही, त्याना तेथून हलवावे लागते. अशा रोटेशनमुळे गेल्या १५ वर्षात आपल्या  जवळ-जवळ ६५०,००० सैनिकाना ह्या वातावरणात कार्य करण्याचा अमुल्य अनुभव मिळाला आहे व भारतीय सेना हि जगातील उत्तम अशा अत्यंत उंच पर्वतीय भागातील सेनापैकी (High altitude troops) एक मानली जातेत्यात ‘लडाख स्काउट’ ने (लदाखवंशी सैनिकांची तुकडी), आपल्या कार्यक्षमतेने युद्धात ठसा उमटवला आहे.

      दिनांक १३ एप्रिल, १९८४ ला भारतीय सेनेने एका गोपनीय सुचनेवरून पाकीस्थानच्या संभाव्य ऑपरेशनला नाकाम करण्यासाठी ‘ऑपरेशन मेघदूत’ राबविले व यशस्वी केले. ‘टाईम्स मागेझीन’ प्रमाणे अंदाजे १००० स्क्वे.कि.मी.चा भाग आपल्या नियंत्रणाखाली आला. कुमाऊ रेजिमेंट आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे इतक्या शीघ्र कारवाई केली की चालून येणाऱ्या पाकिस्थानी सेनेला फक्त सर्व शिखरावर भारतीय सेनेने केलेला कब्जा पहावा लागला. दोन्ही देशांचे सुमारे २००० सैनिक कामी आले. तेव्हापासून सतत आजपर्यंत २९ वर्षे हा संघर्ष सुरु आहे. हा भाग जगातील सर्वात उंच युद्ध-क्षेत्र ठरले. त्यानंतर पाकिस्थानने अनेक वेळा विफल प्रयत्न केले. त्यातील बहुचर्चीत होता १९८४ चा प्रयत्न. हि योजना ‘बिलाफोल्ड ला’ ताब्यात घेण्यासाठी होती पण घमासान (हातघाईच्या) लढाई नंतरही विफल राहिली. एका, दिवसा केलेल्या चढाईत ४५७ मी.चा  सरळ बर्फाळ कडा नायब सुभेदार बाना सिंगने सर करून परम विशिष्ठ सेना मेडल मिळवले. ह्या पराक्रमाची खुण म्हणून ह्या २२,००० मी. उंचीवरच्या आउट-पोस्टला बाना सिंगचे नाव देण्यात आले – बाना पोस्ट! ह्या हल्ल्याची योजना परवेझ मुशर्रफ यांची होती, हे विशेष.

      ह्या नंतरही पाकीस्थानने १९९०, १९९५, १९९६ आणि १९९९च्या सुरवातीला – लाहोर सामिटच्या आधी – प्रयत्न केले.
१९९५च्या प्रयत्नान पाकिस्थानने अंदाजे ४० सैनिक गमावले होते तर १९९६ साली भारताने एक एम.आय/१७ हेलीकॉपटर गमावले. २००३ नंतर ह्या क्षेत्रात युद्धबंदी लागू झाली व त्यानंतर ह्या क्षेत्रात आता शांतता आहे.  

         सियाचेनच्या संदर्भात भारतीय सेनेने अनेक मानबिंदू स्थापित केले आहेत. ‘पोईट सोनंम’ – जगातील सर्वात उंच हेलिपॅडची (२१,०००फु) निर्मिती झाली. भारतीय सैनिकांना आवश्यक साधन सामुग्री पुरविण्यासाठी भारताने ‘ध्रुव’ हेलीकॉपटर ची निर्मिती केली तसेच संपर्कासाठी सर्वात उंच ‘टेलीफोन बूथ’ स्थापन केला. विगत काळात भारतीय सेनेने आपल्या अतीव प्रयत्नांनी इतक्या उंची वरील युद्ध-क्षेत्री जिवंत रहाण्याची व लढायची अनोखी पद्धती अमलात आणली आहे. १९८० च्या दशकात अतिविषम हवामानाप्रमाणे फ्रोस्ट-बाईट व जोखीमभऱ्या दऱ्यामुळे हजारो सैनिकांचे जीव जात. परंतु गेल्या दशकाच्या अंतापर्यंत हा आकडा दरवर्षी २०-२२ पर्यंत खाली आला आहे. गेल्या आठ वर्षात मात्र सियाचेन मध्ये एकही मृत्यू झालेला नाही, हे विशेष. त्याचप्रमाणे दरवर्षी फक्त १०-१२ सैनिकांना अन्य तळावर हलवावे लागते.

     आपण ह्याच मुशर्रफ साहेबांनी आपल्यावर लादलेल्या ‘कारगील युद्धा’चा विचार करू.  Till then.


प्रकाश पटवर्धन 


No comments: